MANGO NEWS | पुणे : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) येथे यंदाच्या आंबा हंगामाची अधिकृत सुरुवात झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर परिसरातून आलेल्या हापूस आणि केशर आंब्यांनी बाजारात पहिली हजेरी लावली आहे. एकूण चार पेट्या बाजारात दाखल झाल्या असून, त्यामध्ये दोन पेट्या हापूस आणि दोन पेट्या केशर आंब्याच्या होत्या.

ही पहिली आवक मे. सुधीर बबनराव मनसुख यांच्या गाळ्यावर झाली. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामातील पहिली आंब्याची पेटी तब्बल १५ हजार रुपये या उच्चांकी दराने विकली गेली. ही पेटी व्यापारी युवराज काची यांनी खरेदी केली. एका पेटीत सुमारे तीन डझन आंबे असून, मिळालेल्या दरामुळे बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आलेला मोहर योग्य प्रकारे जपल्यामुळे यंदा आंब्याची काढणी लवकर शक्य झाली, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजारातील अंदाजानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आंब्याची नियमित आवक सुरू होईल, तर १५ मार्चनंतर बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होण्याची शक्यता आहे.
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आणि केशर आंब्यांना सुरुवातीलाच चांगला भाव मिळाल्याने यंदाचा हंगाम लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात वाढणाऱ्या आवकेकडे बाजारातील व्यापारी आणि फळविक्रेते आशेने पाहत आहेत.


