पुणे, – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात पार पडलेल्या भव्य मेळाव्यात अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांसाठी ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून ५० टक्के तिकिटे महिलांना देण्यात येणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने राष्ट्रवादीने मोठे पाऊल टाकले आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरमध्ये महिलांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मुलींना सैन्यात संधी मिळताच त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने चांगले काम केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५०% तिकिटे महिलांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. संधी मिळाल्यास महिला आपले नेतृत्व सिद्ध करतात, हे वारंवार दिसून आले आहे.”
पुढे बोलताना पवार म्हणाले, “एक काळ असा होता की पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्वांना सोबत घेऊन जाणारा देश होता. आज मात्र शेजारी देशांशी संबंध बिघडले आहेत. देशाच्या नेतृत्वाने सुसंवाद साधावा, ही काळाची गरज आहे.”
तसेच, जयंत पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करत, नव्या पिढीला संधी देण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य निवडणुका एकत्र लढायच्या की स्वतंत्र, याचा निर्णय जिल्हा नेतृत्व घेईल. निवडणुकांनंतर नव्या नेतृत्वाबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील महिलांना राजकारणात मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महिला नेतृत्वाचा नवा चेहरा पाहायला मिळणार आहे.