मुंबई: भविष्यात ‘एसटी’च्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बससेवा पुरवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ‘एसटी’च्या ‘स्मार्ट बसेस’ घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री तथा ‘एसटी महामंडळा’चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
नव्या तीन हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बोलावलेल्या बसबांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला ‘एसटी महामंडळा’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि संबंधित खाते प्रमुखांसह बसबांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, “नवीन लालपरीसह येणार्या सर्व बसेसमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, ‘जीपीएस’ तंत्रज्ञान एलईडी टीव्ही, वाय फाय, चालक ब्रेथ नालाईज यंत्रणा, याबरोबरच चोरी-प्रतिबंध तंत्रज्ञानवर आधारित ‘बस लॉक सिस्टम’ असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील.
स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार असून, प्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये,
यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरदेखील या कॅमेराचा ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवून असणार आहे. तसेच बसस्थानक व परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेसदेखील पूर्णतः बंद राहतील, अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार आहे,” अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
महत्त्वाच्या माहितीसाठी एलईडी टीव्ही
“नवीन बसेसमध्ये लावण्यात येणार्या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून जाहिरातींबरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच सन्माननीय पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासातदेखील प्रवासी जगभरातील घडामोडी बाबत अपडेट राहतील. तसेच बसच्या बाहेरील बाजूसदेखील जाहिरातप्रसिद्धीकरिता एलईडी पॅनेल लावण्यात येणार आहेत. यातून महामंडळाचा जाहिरात महसूल वाढण्यास मदत होणार आहे.
फोमबेस आग प्रतिबंधक यंत्रणा
“सध्या तापमानवाढीमुळे ‘एसटी’ बसेसना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फोमबेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार असून बसमध्ये जेथे आग लागेल, त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी संबंधित फोम वापरून आग तत्काळ विझवण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा सुरक्षिततेबरोबरच बसच्या अपघातांची संख्या कमी करणे, तसेच बसफेर्यांचा वक्तशीरपणा वाढवण्यासाठीदेखील मदत होेईल. त्यामुळे भविष्यात खर्या अर्थाने ‘एसटी’ ‘स्मार्ट’ होईल,” असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.