PUNE | आध्यात्मिक साधना आणि आधुनिक जीवनशैली यांचा समतोल साधणाऱ्या कार्याची दखल घेत अक्कलकोट येथे डॉ. प्रचिती पुंडे यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘श्री स्वामी कृपा सेवा गुणीजन पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
अक्कलकोटच्या पवित्र भूमीत पार पडलेल्या भव्य सोहळ्यात ग्लोमोवेलच्या संस्थापिका, पेटंट धारक, २५ पुस्तकांच्या लेखिका आणि ‘इन्स्टंट एनर्जी प्रॉडक्टिव्हिटी’ कोच डॉ. प्रचिती पुंडे यांचा सन्मान करण्यात आला. वर्षातून केवळ एका व्यक्तीला दिला जाणारा हा दुर्मिळ पुरस्कार त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत प्रदान करण्यात येतो.
हा पुरस्कार श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आणि कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या अक्कलकोटमध्ये झालेल्या या सोहळ्याला विविध मठांचे पूजनीय मठाधिपती आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्काराचे वितरण अनेक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात प. पू. जयकेशवदास महाराज, प. पू. अभिजीत बसवलिंग महाराज, प. पू. बसवलिंग महाराज, प. पू. अभिनव महाशिवलिंगेश्वर महाराज, प. पू. प्रशांत स्वामीजी, प. पू. डॉ. पुज्यलाल राजिमवाले महाराज, प. पू. मोहनराव पुजारी आणि प. पू. बी. एस. अप्पा महाराज यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही उपस्थिती लावली. आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलिंद कल्याणशेट्टी, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, माजी सभापती संपतराव शिंदे-पाटील, देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. पुंडे यांच्या ‘सोलफुल एनर्जी हीलिंग’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. ऊर्जा व्यवस्थापन, भावनिक संतुलन आणि स्व-उपचार प्रक्रियेवर आधारित हे पुस्तक आधुनिक विज्ञान आणि आध्यात्मिकतेचा संगम दर्शवते.
स्वामी समर्थांच्या भक्तीतून प्रेरणा घेत आपल्या कार्याचा प्रवास सुरू झाल्याचे सांगताना डॉ. प्रचिती पुंडे यांनी हा सन्मान आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे नमूद केले. लहानपणापासून स्वामी भजन आणि आध्यात्मिक संस्कार यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडला, असेही त्यांनी सांगितले.
एकूणच, डॉ. प्रचिती पुंडे यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची दखल घेणारा असून, आध्यात्मिकता आणि आधुनिकतेचा संगम घडविणाऱ्या त्यांच्या प्रयत्नांना नवे बळ देणारा ठरला आहे.


