भारतीय डिजिटल मनोरंजनविश्वात नवनवीन प्रयोग करणाऱ्या The Viral Fever (TVF) च्या ‘ग्राम चिकित्सालय’ या नव्या वेब मालिकेमुळे अभिनेता अमोल पराशर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याचा चर्चेचा विषय केवळ त्याचा अभिनय नसून, TVF चे संस्थापक अरुणाभ कुमार यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त केलेली त्याची कृतज्ञता आणि भावनिक पोस्टही ठरली आहे.
‘ग्राम चिकित्सालय’ या ग्रामीण भारताच्या वास्तवाशी जोडलेल्या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अमोल पराशरने या मालिकेत साकारलेल्या भूमिकेचे कौतुक होत असतानाच, त्याने आपल्या करिअरमधील महत्त्वाच्या टप्प्यांवर अरुणाभ कुमार यांनी दिलेल्या विश्वासाचे आणि संधीचे मनापासून आभार मानले आहेत.
अमोल पराशरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा वाटलं मीच एकटा असा आहे ज्याने ‘कीमती डिग्री’ सोडली… पण नंतर कळालं की, आणखी काही IITian देखील याच स्वप्नासाठी इथे आले होते — ऑन-स्क्रीन स्टोरीटेलिंग. AK (अरुणाभ कुमार) लवकरच एक मार्गदर्शक झाले — जे फक्त टीम तयार करत नाहीत, तर त्या टीमवर संपूर्ण विश्वास ठेवतात. आज मागे वळून पाहताना कळतं, की हाच तो विश्वास होता ज्यामुळे DJ चितवनपासून ‘ग्राम चिकित्सालय’पर्यंतचा माझा प्रवास शक्य झाला.”
त्याने पुढे म्हटलं, “AK आणि TVF ने अशा कथांवर विश्वास ठेवला ज्यावर कोणीही सट्टा लावला नसता… अशा टॅलेंटला संधी दिली, ज्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणीही ओळखत नव्हतं. ग्राम चिकित्सालयसारखा शो — बिनधास्त, जमिनीशी जोडलेला, आणि तरीही काहीतरी वेगळा — हा त्यांच्या दृष्टिकोनाचा उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या सततच्या विश्वासासाठी आणि प्रोत्साहनासाठी मी सदैव ऋणी आहे.”
अमोल पराशरने याआधी ‘TVF ट्रिपलिंग’मधील ‘चितवन शर्मा’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप पाडली होती. आता ‘ग्राम चिकित्सालय’मधून त्याने पुन्हा एकदा आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवली आहे.
TVF च्या स्थापनेपासूनच अरुणाभ कुमार यांनी भारतीय वेब स्टोरीटेलिंगमध्ये आमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांनी नव्या कथा, नव्या टॅलेंट्सना व्यासपीठ आणि भारतीय तरुणाईला आपलेसे वाटणारे शोज दिले. ‘ग्राम चिकित्सालय’ ही मालिका केवळ एक वेब शो नसून, डिजिटल भारतातील नव्या कहाण्यांच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. अशा प्रयोगशीलतेला दिशा देणारे अरुणाभ कुमार हे या क्षेत्रातील खरे प्रेरणास्थान आहेत.