पुणे- भारतीय लष्कराने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हाती घेतलेल्या **‘ऑपरेशन सिंदूर’**च्या यशानंतर, पाकिस्तानला ठोस इशारा देण्यासाठी ‘भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’ रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा *आरपीआय (आठवले गट)*चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे, तसेच गंगाधर आंबेडकर, सूर्यकांत वाघमारे, असित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, मोहन जगताप, महिपाल वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

“पाकिस्तानला ठोस संदेश देण्यासाठी देशभरात रॅली”
आठवले म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय लष्कराचे अभिनंदन करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात विविध पक्षांकडून तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर आरपीआयच्या वतीने सर्व जिल्ह्यांमध्ये व महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’ रॅलीचे आयोजन केले जाईल.”
“पाकव्याप्त काश्मीर ताब्यात येईपर्यंत लढा सुरूच ठेवावा”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे की, युद्धविराम असला तरी ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे. यावर भाष्य करत आठवले म्हणाले, “पाकव्याप्त जम्मू-काश्मीर भारताच्या ताब्यात येईपर्यंत आणि दहशतवादी कारवाया पूर्ण थांबत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानविरोधी लढा थांबवू नये. हाच आमचा पक्षाचा ठाम मत आहे.”
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरपीआयचा दावा
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आठवले म्हणाले, “महायुतीमध्ये (भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व आरपीआय) सामंजस्याने निवडणूक लढवावी. पुणे महापालिकेत किमान 15 प्रभागांत उमेदवारी, उपमहापौर पद आणि आरक्षण आल्यास महापौर पद आरपीआयला मिळावे, अशी आमची आग्रही मागणी आहे.”
“नरकात की स्वर्गात, आधी ठरवा!”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी-शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यावर आठवले म्हणाले, “राऊत यांनी आधी ठरवावे की त्यांना नरकात जायचे की स्वर्गात. एकाचवेळी दोन्ही ठिकाणी जाता येत नाही!” अशी कोपरखळी मारत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
“मंत्रीपद नव्हे, समाज महत्त्वाचा”
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एकत्र येण्याच्या संभाव्यतेवर उत्तर देताना आठवले म्हणाले, “माझ्यासाठी मंत्रीपद नव्हे, तर समाजाचे हित महत्त्वाचे आहे. सर्व आंबेडकरी गट एकत्र येणार असतील, तर त्यांच्या नेतृत्वासाठी प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण साथ देण्यास मी तयार आहे.”
भीमा कोरेगाव विकासासाठी निधीची ग्वाही
भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या विकास आराखड्यासाठी 100 ते 150 एकर जागा ताब्यात घेऊन विकास आराखडा सादर करावा, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाला दिली असून, त्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी आपण सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेनंतर आठवले यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली