
पुणे- मागील वर्षी आषाढी वारी दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीच्या पार्श्वभूमीवर यंदा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी, पालखी प्रस्थानावेळी मर्यादित वारकऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात प्रति दिंडी ९० वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या निर्णयानुसार, मानाच्या ४७ दिंड्या आणि ९ उपदिंडी अशा ५९ दिंड्यांमधील वारकऱ्यांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी पालखी प्रस्थानाच्या दिवशी देऊळवाड्यात प्रवेश देताना मानाच्या प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची संख्या नव्वद करण्याचा प्रायोगिक निर्णय केला आहे. प्रशासन आणि मानाच्या दिंडीकऱ्यांकडून यास एकमुखाने दुजोरा दिला. दरम्यान, प्रस्थान सोहळ्यास अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी राजकीय मंडळी, प्रशासन आणि मीडियाच्या संख्येवर कमालीचे नियंत्रण घालण्यात येणार आहे.

प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनाबाबत आळंदी देवस्थानच्या भक्त निवासात बैठक झाली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गौड, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, राणू महाराज वासकर, भाऊसाहेब गोसावी, भाऊ महाराज फुरसुंगीकर, मारुती कोकाटे यांच्यासह दिंडी चालक-मालक उपस्थित होते.
यावेळी महेंद्र महाजन म्हणाले, ‘मागील दोन वर्षांत पालखी सोहळ्याला काही कारणाने गालबोट लागले आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सोहळा सुखरूप, तसेच नियंत्रणात ठेवण्यासाठी मागील वर्षी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना मर्यादित प्रवेश दिला होता. देऊळवाड्यातील परिसर कमी असल्याने तेथे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी दिंड्यांमधील वारकऱ्यांना मर्यादित प्रवेश दिला होता.
देऊळवाड्याच्या प्रांगणात ४२५० वारकरी बसू शकतात, अशी आकडेवारी प्रशासनाने निश्चित केली होती. प्रत्येकाला मंदिरात जाण्याची इच्छा असते. वारकरी विद्यार्थी आणि पोलिस यामध्ये हुज्जत झाली. त्यावेळी लाठीमारासारखी घटना घडली. हा सोहळा सुरळीत पार पाडावा, यासाठी मानाच्या दिंड्यांतील वारकरी संख्या ९० करणे आवश्यक आहे.’

चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!