पुणे – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी रविवारी पुण्यात तिरंगा यात्रा काढण्यात आली. पावसाच्या सरी झेलतही पुणेकरांनी देशप्रेमाने ओतप्रोत प्रतिसाद देत ही यात्रा भव्यतेत पार पाडली.
छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक (डेक्कन जिमखाना) येथून तिरंगा यात्रेला प्रारंभ झाला. हातात तिरंगा धारण करत ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ आणि ‘दहशतवाद मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. यात्रेची सांगता ज्ञानेश्वर पादुका चौक येथे झालेल्या सभेने झाली.

यात्रेत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, तसेच माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले, संदीप खर्डेकर, पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, सुभाष जंगले, राहुल भंडारे, प्रमोद कोंढरे, वर्षा तापकीर, गणेश कळमकर, रवींद्र साळेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीही या यात्रेत सहभाग नोंदवला. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त वसंत गोखले, मनोज एरंडे, शरद केळकर, अर्जुन पुरस्कारप्राप्त रेखा भिडे-मुंडफन, मनोज पिंगळे यांचा सहभाग लक्षणीय होता.
विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी देशप्रेमाने भारलेल्या वातावरणात तिरंगा यात्रेचे साक्षीदार होत आपला राष्ट्राभिमान व्यक्त केला.