पुणे :वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर राज्यभरात संतापाची लाट असताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (२३ मे) कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “या प्रकरणात महिला आयोगाने पहिल्याच दिवशी सुमोटो (स्वतःहून) दखल घेतली असून, पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.”
रूपाली चाकणकर म्हणाल्या, “६ नोव्हेंबर २०२४ रोजी करीश्मा हगवणे यांनी रात्री ११.५० वाजता राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर आयोगाने संबंधित पोलिस स्टेशनला कारवाईचे निर्देश दिले. त्याच दिवशी मयुरी हगवणे यांच्या भावानेही तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारी ७ तारखेला बावधन पोलिस स्टेशनला पाठवण्यात आल्या आणि कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी काउंसलिंगही करण्यात आले.”
“वैष्णवीच्या संदर्भात आयोगाकडे पूर्वी कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, तिच्या मृत्यूनंतर पहिल्याच दिवशी आम्ही सुमोटो दखल घेतली आहे. वैष्णवीच्या पालकांनी अजून काही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून, पोलिसांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कायदे असूनही घटना थांबत नाहीत
रूपाली चाकणकर यांनी समाजातील गंभीर वास्तवावर भाष्य करताना सांगितले, “बालविवाह, हुंडाबंदी, गर्भनिदान चाचणी यांसारखे कायदे असूनही आजही मोठ्या प्रमाणावर या घटना घडतात. हुंड्यासाठी महिलांचा मानसिक व शारीरिक छळ होतो आणि त्या आत्महत्येकडे प्रवृत्त होतात. बालविवाहाचा कायदा असतानाही ग्रामीण भागात बालविवाह होताना दिसतात. गर्भनिदान चाचणीवर बंदी असली तरीही लोक शेजारच्या जिल्ह्यात जाऊन चाचणी करतात. मुलीचा गर्भ असल्यास त्याची हत्या केली जाते. हे पाहता, आपल्याकडे कायदे असूनही त्यांचे उल्लंघन करण्याकडेच कल आहे, हे चिंताजनक आहे.”
“हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कुठेही हुंड्याची मागणी झाल्यास तात्काळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
१६ मे रोजी पुण्यातील भुकूम येथे वैष्णवी हगवणे (वय २३) हिने सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात तिच्या पतीसह सासू, नणंद यांना अटक झाली असून आज पहाटे सासरे व दीर यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.