पुणे : गुजर-निंबाळकरवाडी येथील सरहद संस्थेच्या आवारात उभारण्यात येणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यान हा देशाच्या इतिहासात नोंद होणारा उपक्रम ठरेल, असा विश्वास मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या उद्यानाचे भूमिपूजन उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, “आजच्या काळात आपण मातृभाषेला विसरत चाललो आहोत. अशा वेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची ओळख दर्शविणारे हे उद्यान मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी ऐतिहासिक ठरेल.” सरहद संस्थेत काश्मिरी भगिनीने सादर केलेले महाराष्ट्र गीत हेच मराठी भाषेचे संवर्धन असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, समन्वयक लेशपाल जवळगे, झाहिद भट, वैभव वाघ, प्रमोद भानगिरे, संतोष बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री सामंत पुढे म्हणाले, “या उद्यानाच्या माध्यमातून देशातील पहिले साहित्य दालन सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष यांच्या कार्याची ओळख जगासमोर येईल.” इंग्रजी भाषेला पर्यायी मराठी शब्द शोधण्यासाठी सरहदने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी सांगितले की, “या उद्यानाच्या माध्यमातून आजवरच्या सर्व साहित्य संमेलनांच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची ओळख जपली जाईल. साहित्य, भाषा, कला, संस्कृती यांचा सुंदर संगम येथे घडेल.”
प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले, “साहित्य संमेलने ही महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहेत. सरहदच्या या उपक्रमातून निर्माण होणारे हे उद्यान साहित्यप्रेमींना वैचारिक ऊर्जा देणारे केंद्र ठरेल.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीस काश्मिरी गायिका शमिमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. उद्यानाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन लेशपाल जवळगे यांनी केले, तर आभार वैभव वाघ यांनी मानले.