पिंपरी – अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षणाचा न्याय मिळावा, यासाठी सकल मातंग समाज, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने “आक्रोश महाआंदोलन” २० मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता मुंबईच्या आझाद मैदानात आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाचा प्रमुख उद्देश अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते जून २०२५ पासून तातडीने लागू करावे, अशी सरकारकडे जोरदार मागणी आहे. समाजातील वंचित घटकांना शैक्षणिक संधी, शासकीय नोकऱ्या आणि कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी हे उपवर्गीकरण गरजेचे असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
हक्काचे आरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक!
आंदोलकांच्या मते, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ काही ठराविक घटकांपुरताच मर्यादित राहिलेला असून, इतर सामाजिकदृष्ट्या दुर्बल उपगट वंचित राहिले आहेत. त्यामुळे आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय सुनिश्चित करणे आवश्यक झाले आहे.
प्रमुख नेत्यांची आंदोलनात उपस्थिती
या आंदोलनाला राज्यातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी व समाजनेत्यांनी पाठिंबा दिला असून, खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत:
- अमित गोरखे – आमदार, विधानपरिषद
- सुनील कांबळे – आमदार
- जितेश अंतापूरकर – आमदार
- मधुकरराव घाटे – माजी आमदार
- नामदेव जयराम ससाणे – माजी आमदार
- रमेश बागवे – माजी मंत्री
- दिलीप कांबळे – माजी मंत्री
- सचिन साठे – अण्णाभाऊ साठेंचे नातू
याशिवाय दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे, मारुती वाडेकर, अशोक लोखंडे, राम चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.