मतचोरीविरोधात प्रदेश काँग्रेसचे “वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” स्वाक्षरी मोहिम सुरु.
पुणे,मुंबई – सोशल मीडिया हे आजचे प्रभावी अस्त्र असून याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे संदेश, दररोजची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहवणे सहज शक्य होत आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रीयपणे सर्वच सोशल मीडिया व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्ष सुप्रिया श्रीनेत यांनी केले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी ‘सोशल मीडिया’ या विषयावर सुप्रिया श्रीनेत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पाच महिन्यात मतदारांची संख्या कशी वाढली याची माहिती दिली तसेच मतचोरी कशी करण्यात आली हे राहुल गांधी यांनी केलेली पोलखोल दाखवली. २००४ ते २००२४ च्या दरम्यान झालेल्या सर्व निवडणुकातील मतदारसंख्या व झालेले मतदान यांची आकडेवारीसह माहिती दिली. आज मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांवर भाजपाने कब्जा करून ठेवला आहे आणि काँग्रेसला प्रसिद्धी खूप कमी दिली जाते अशा परिस्थितीत सोशल मीडिया हेच महत्वाचे साधन ठरत आहे असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची भरपूर कामे केली आहेत. युपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क कायद्या सारखी अत्यंत महत्वाची कामे केली पण मागील ११ वर्षात भाजपा सरकारने केलेले एकही काम उल्लेखनीय नाही. जनकल्याणाची कामे करूनही काँग्रेस पक्ष प्रचार व प्रसार करण्यात कमी पडला. आता जागे व्हा व जास्तीत जास्त प्रमाणात सोशल मीडियावर सक्रीय व्हा, असे श्रीनेत यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी सोशल मीडिया संदर्भात काही प्रश्न विचारले, त्याची सुप्रिया श्रीनेत यांनी उत्तरेही दिली.
काँग्रेस एक चळवळ व विचारधारा..
ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी, ‘गांधी नेहरु व आंबेडकर’ याविषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले की, काँग्रेस हा एक विचार आहे, एक चळवळ आहे. आज काँग्रेस रस्त्यावर दिसत आहे व संसदेतही दिसत आहे. राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडून एका ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे. काँग्रेस पक्षाकडे महात्मा गांधी, पंडित नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा आहे. विरोधकांनी ‘संघ’ उभा केला पण काँग्रेसने ‘संघराज्य’ उभे केले आहे. सर्वांना मतांचा अधिकार देणारा भारत हा पहिला देश आहे, हे ऐतिहासिक काम काँग्रेस पक्षामुळेच शक्य झाले आहे. मतदार यादी बनवणे अत्यंत अवघड काम होते पण ते काँग्रेसने करून दाखवले, त्यामानाने मतदार याद्यात घोळ घालणे सोपे आहे, असा टोला लगावत लोकशाहीवर जेव्हा आघात होत आहे त्यावेळी काँग्रेस उभी आहे हे संजय आवटे यांनी सांगितले.
आज काँग्रेस सत्तेत नाही आणि हाच काळ काँग्रेससाठी सर्वात चांगला काळ आहे. जे नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले ते सत्तेसाठी गेले असेही संजय आवटे म्हणाले. काँग्रेस पक्षाची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी ते राहुल गांधी यांच्याबद्दलही संजय आवटे यांनी सविस्तर व्याख्यान दिले.
काँग्रेस पदाधिका-यांच्या कार्यशाळेच्या दुस-या दिवसाची सुरुवात सामूहिक प्रार्थनेने झाली. या प्रार्थनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
“नोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” स्वाक्षरी मोहिम.
निवडणूक आयोग आणि भाजपाने संगनमताने मतचोरी करून निवडणुकीत विजय कसा मिळवला याचा पर्दाफाश राहुलजी गांधी यांनी केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या मतचोरीविरोधात “वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” ही स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे.
पुण्याच्या खडकवासला येथील शिबिर स्थळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC सदस्य नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वाक्ष-या करून या मोहिमेचा शुभारंभ केला.