पुणे: पुणे महानगर क्षेत्रात सध्या २२० महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प प्रगतीपथावर असून, या प्रकल्पांसाठी राज्य सरकारने तब्बल ३२ हजार ५२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुण्यात उद्योग उभारण्यासाठी देश-विदेशातील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर उत्सुक असून, या गुंतवणुकीतून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. उद्योगांना आकर्षित करणे आणि पुणेकरांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि नागरिकांचे शहरातील वास्तव्य अधिक सुखकर करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्राचा एकात्मिक विकास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, निर्धारित कालमर्यादेत पुणे महानगर क्षेत्रासाठी संपूर्ण आणि पक्का विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पुणे महानगर क्षेत्रासाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्रा) संस्थेची चाचपणी करण्यात येत आहे. हिंजवडी, बाणेर, बालेवाडी परिसरात आयटी, बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांची मोठी उपस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील माण-म्हाळुंगे टाऊनशिप प्लॅनिंग योजनेला गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पुण्याचा रिंग रोड हा प्रकल्प जवळपास वीस वर्षांपूर्वी, म्हणजे २००७ साली प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र त्यानंतरच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात या प्रकल्पावर ठोस काम झाले नाही. या दिरंगाईमुळे गेल्या दोन दशकांत पुण्याच्या चहूबाजूंनी मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आणि त्याचा थेट फटका उपनगरांना सहन करावा लागत आहे.
अवजड वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका, प्रवासाचा वाढलेला कालावधी आणि प्रदूषण अशा अनेक समस्या यामुळे उद्भवल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिंग रोड प्रकल्पाला गती दिली असून, सध्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याबाबत कधीही दुजाभाव केला नाही. राज्यातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. पुण्याभोवती होणाऱ्या रिंग रोडमुळे सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचे मूल्य निर्माण होण्याची क्षमता आहे. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या विकासाचा वेग दुप्पट होईल. पुणेकरांनी महापालिकेत भाजपाला एकहाती सत्ता दिल्यास पुणे देशातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारे शहर ठरेल, याची मला खात्री आहे.
— चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री


