40.1 C
New Delhi
Saturday, May 23, 2026
HomeTop Five Newsवाहतूक कोंडी गंभीर; पुढील चार वर्षांत पुण्याचा कायापालट – पोलीस आयुक्त

वाहतूक कोंडी गंभीर; पुढील चार वर्षांत पुण्याचा कायापालट – पोलीस आयुक्त


pune traffice | पुणे- पुणे शहरातील वाढती वाहतूक ही सध्या गंभीर आणि गुंतागुंतीची समस्या असली, तरी सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांमुळे पुढील तीन ते चार वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा विश्वास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला. उड्डाणपूल, मेट्रो आणि इतर वाहतूक सुधारणा प्रकल्पांमुळे शहराच्या रस्ते व्यवस्थेला बळकटी मिळणार असून, दीर्घकालीन दृष्टीने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

द इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए)च्या पुणे शाखेतर्फे वास्तुविशारद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ वास्तुविशारदांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आयआयए पुणे शाखेचे अध्यक्ष विकास अचलकर, उपाध्यक्ष सीतेश अग्रवाल, समीर बेलवलकर आणि सौरभ जांगले उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी शहर विकासात वास्तुविशारदांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या केवळ पोलीस विभागाच्या प्रयत्नांनी सुटणारी नाही, तर त्यासाठी दीर्घकालीन नियोजन आणि मजबूत पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, असे ते म्हणाले. मेट्रो प्रकल्प आणि विविध उड्डाणपूल पूर्णत्वास गेल्यानंतर शहरातील प्रमुख चौकांवरील ताण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काही पोलीस ठाण्यांच्या इमारती भाडेतत्त्वावर आहेत, तर काही इमारती जुन्या व जीर्ण झालेल्या आहेत. नव्या इमारतींसाठीची प्रक्रिया सुरू असून, पोलीस आयुक्तालयाच्या नव्या मुख्य इमारतीचे बांधकामही सुरू आहे. पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

उड्डाणपुलांच्या खालील मोकळ्या जागांचा योग्य वापर व्हावा, यावरही त्यांनी भर दिला. या जागांचे सुशोभीकरण आणि नियोजनबद्ध वापर केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल तसेच अतिक्रमणासही आळा बसेल, असे त्यांनी नमूद केले.

वास्तुविशारद हे कल्पक आणि जबाबदार व्यावसायिक असतात. त्यांनी चुकीच्या कागदपत्रांवर सही होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. नवीन इमारती उभारताना पार्किंगसाठी पुरेशी जागा राखून ठेवणे अत्यावश्यक आहे. रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा न येता ये-जा करता यावी, यासाठी नियोजनपूर्वक मोकळी जागा ठेवली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एकूणच, वाहतुकीची समस्या गंभीर असली तरी समन्वयित नियोजन, सक्षम अंमलबजावणी आणि तांत्रिक दृष्टिकोन यांच्या बळावर पुण्याचा शहरी विकास अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
40.1 ° C
40.1 °
40.1 °
22 %
5.1kmh
40 %
Sat
42 °
Sun
46 °
Mon
47 °
Tue
46 °
Wed
47 °

Most Popular

Recent Comments