पुणे : कर्वेनगर येथील स्मशानभूमी परिसरातील अस्वच्छता, अपूर्ण कामे आणि धोकादायक रस्त्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अलीकडे एका अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांनी तेथील दुरवस्थेकडे लक्ष वेधत संबंधित प्रशासनाने तातडीने खुलासा करावा आणि प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे.

स्मशानभूमी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले असून आत जाण्याचा रस्ता अरुंद आणि धोकादायक बनला आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने आत घेऊन जाणे कठीण होत असून पार्किंगची कोणतीही योग्य व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे अंत्यविधीसारख्या संवेदनशील प्रसंगी नातेवाईकांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
परिसरातील कलवर्टचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळते. संबंधित कामे दीर्घकाळ प्रलंबित असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ही कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.
दरम्यान, स्मशानभूमीत उभारण्यात येत असलेल्या विद्युत दाहिनीचे कामही अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येते. संबंधित साहित्य सर्वत्र पडून असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. हे काम प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे का, तसेच त्यामध्ये काही अडचणी आहेत का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बदलत्या काळानुसार पर्यावरणपूरक उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक असल्याने सर्व स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनीची सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्याबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात यावेत, अशीही सूचना नागरिकांकडून करण्यात आली आहे.
एकूणच, अंत्यविधीसारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगी नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कामे पूर्ण करावीत आणि परिस्थिती सुधारावी, अशी मागणी जोर धरत आहे


