परिसंवादातील सूर : नेरवा एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ज्ञानभारती परिसंवादाचे आयोजन
पुणे : धर्म आणि अध्यात्म भारतीय संस्कृतीचा भाग आहे. परंतु ते समजून न घेता भारतीय ज्ञान परंपरेला धर्म आणि अध्यात्माशी जोडून तथाकथित विचारवंतांचा गोंधळ होत आहे. भारतीय ज्ञान परंपरा युवा पिढीपर्यंत आत्मविश्वासाने मांडायची गरज आहे. मातृभाषेतूनच भारतीय ज्ञान परंपरेचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो, असा सूर ज्ञानभारती परिसंवादत उमटला.
भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित ज्ञानभारती परिसंवादाचे नेरवा एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले होते. यात भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीमचे संस्थापक क्षितिज पाटुकले, डीआरडीओचे माजी समूह संचालक काशिनाथ देवधर, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीमधील स्कूल ऑफ वैदिक सायन्सेसच्या असोसिएट डीन प्रा. डॉ. माधवी गोडबोले, नेरवा एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. विंदी पुजारी, मराठवाडा मित्र मंडळातील प्रा. डॉ. सुजाता शेणई, फग्युर्सन महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंद काटीकर यांचा सहभाग होता. भारतीय विचार साधना सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. विंदी पुजारी यांनी सुरुवातीस फाउंडेशनतर्फे भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. पुजारी यांनी भारतीय ज्ञान म्हणजे काय आणि हे ज्ञान एकत्रित दृष्टिकोनातून नव्या पिढीपर्यंत कसे नेता येईल याबाबत विचार मांडले. परिसंवादात सहभागी मान्यवरांशी शिल्पा देशपांडे यांनी संवाद साधला.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारतीय ज्ञान प्रणालीचा वापर होऊ शकतो, असे सांगून काशिनाथ देवधर म्हणाले, एकात्मिक दृष्टीकोनातून भारतीय ज्ञान प्रणालीचा विचार झाला तर देशाच्या विकासासाठी ते उपयुक्त ठरू शकते.
क्षितिज पाटुकले म्हणाले, भारतीय ज्ञान प्रणालीबाबत चुकीची माहिती पसरविण्यात आली आहे. दृष्टिकोन समारात्मक ठेवून शिक्षण व्यवस्थेत मुलभूत बदल झाल्यास त्यातून फलश्रुती मिळू शकेल. बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिक्षण प्रणालीविषयी माहिती युवा वर्गापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
प्रा. अनंत काटिकर म्हणाले, परंपरागत चालत आलेले ज्ञानार्जनाचे मार्ग बंद करून व्यावहारिक शिक्षणावर भर दिला जात आहे. भारतीय ज्ञान परंपरा हा मूल्यांचा विषय असून ही प्रणाली आत्मसाद केल्यास रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात.
भारतीय ज्ञान प्रणाली काय आहे हे आधी समजून घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करून डॉ. सुजाता शेणई म्हणाल्या, भारतीय ज्ञान प्रणालीविषयी संशोधन झाल्यास सर्जनशीलतेने सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. यासाठी मातृभाषेलाही महत्त्व दिले पाहिजे.
प्रा. डॉ. माधवी गोडबोले म्हणाल्या, शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत भारतीय ज्ञान प्रणालीचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे. या प्रणालीचा अवलंब करताना शिक्षकाची भूमिकाही महत्त्वाची आहे. भारतीय ज्ञान प्रणालीविषयी प्रत्येकाने जिज्ञासा जागी ठेवणे आवश्यक आहे. मूळ स्रोत न बदलता संकल्पना मांडणे आवश्यक आहे.
आदि शंकराचार्य शैक्षणिक संस्था समूह कुलगुरू डॉ. व्यंकी पेंचलय्या, युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. रोहन शेट्टी, अद्वंत शाळेच्या प्राचार्य कल्पना वानखेडे यांची उपस्थिती होती.


