पुणे : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महत्त्वाची भूमिका स्पष्ट करत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.
काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी सांगितले की, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार माघारी घेतला असला, तरी हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्यासाठी घेतलेला नाही. “आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महायुतीलाही नाही आणि इतर कोणत्याही पक्षालाही नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयाबाबत अधिक बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोणताही संवाद किंवा दबाव नसल्याचेही ठामपणे सांगितले. “हा निर्णय कोणत्याही बाह्य प्रभावाखाली घेतलेला नसून, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच घेण्यात आला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार राज्य नेतृत्वाला दिले होते. त्यानुसार बारामतीतील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, काँग्रेस राज्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करणार असल्याचेही सपकाळ यांनी जाहीर केले. ‘संघटन सृजन’ अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात सुमारे साडेसात हजार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, तसेच महापालिकेतील गटनेते चंदू कदम यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने घेतलेल्या या ‘न्यूट्रल’ भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


