पुणे: जेजुरीजवळील (ता. पुरंदर) बेलसर टोलनाक्यावर पुरंदर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश प्रमोद पवार यांनी केली. या मागणीचे निवेदन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (एनएचएआय) महासंचालक संजय कदम यांच्याकडे देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष लहुअण्णा निवंगुणे, पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष साहेबराव फडतरे, प्रदेश युवक सचिव विश्वजीत जाधव, जिल्हा युवक उपाध्यक्ष सुरज कारदगे, जिल्हा युवक सरचिटणीस सुजित शिंदे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेश पवार म्हणाले, “पुरंदर तालुक्यातील जनतेवर अन्यायकारक पद्धतीने टोलचा बोजा टाकला जात असून, स्थानिक नागरिकांकडून वारंवार टोल वसुली केली जात आहे. स्थानिक नागरिकांना कोणतीही सवलत न देता त्यांची आर्थिक लूट सुरू आहे. हा प्रकार तात्काळ बंद करून स्थानिकांना संपूर्ण टोल माफी देण्यात यावी, अशी युवक काँग्रेसची ठाम भूमिका आहे. जर प्रशासनाने ही मागणी तात्काळ मान्य केली नाही, तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. टोल नाक्यावर रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मोर्चा तसेच लोकशाही मार्गाने मोठा लढा उभारला जाईल.”
तसेच सासवडमध्ये जाणारा व सासवडमधून बाहेर पडणाऱ्या दोन्ही प्रमुख मार्गांवर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असल्याने त्या ठिकाणी पूल (ओव्हरब्रिज) उभारण्यात यावेत. सुकलवाडी व वागदरवाडी फाटा येथेही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी तात्काळ ब्रिज बांधण्यात यावा आणि जेजुरी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडी व गैरसोयीचा त्रास होत असल्याने, जेजुरी ओव्हरब्रिज तातडीने उभारण्यात यावा, या मागण्या युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आल्या. या सर्व मागण्यांबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शंभर टक्के तुमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करू, असे आश्वासन दिले.


