MarathiNews | पुणे : “भारत आता मार खाणारा देश राहिला नाही, तर गरज पडल्यास घुसून मारणारा देश झाला आहे,” असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपविल्यानंतर भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणात मोठा बदल अनुभवला असून, त्यातून देश अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण बनल्याचे त्यांनी नमूद केले.(BreakingNews)
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल मैदानावर आयोजित सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
समारंभात बोलताना फडणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्याची समृद्ध परंपरा निर्माण केली आहे. यंदा राष्ट्रीय सुरक्षेला नवी दिशा देणारे आणि संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणारे अजित डोवाल यांची निवड झाल्याचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.(NationalSecurity)
अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी, “एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले आहेत आणि राष्ट्रीय चाणक्यांचा सन्मान करण्यासाठी राजकीय चाणक्य उपस्थित आहेत,” अशा शब्दांत अमित शाह आणि अजित डोवाल यांचा उल्लेख केला.(DevendraFadnavis)
डोवाल हे दूरदृष्टी असलेले, स्पष्टवक्ते आणि रणनीतीत पारंगत व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, “जिंकलो तर इतिहास घडतो आणि हरलो तर इतिहासजमा होतो,” या विचाराने त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सुरक्षा धोरणात निर्णायक बदल झाला असून, देशाने कठोर आणि प्रभावी भूमिका स्वीकारली आहे.
लोकमान्य टिळकांच्या कार्याचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” या घोषणेद्वारे टिळकांनी भारतीय राष्ट्रवादाला नवी ऊर्जा दिली. शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला एकत्र आणत स्वातंत्र्यलढ्याला व्यापक लोकाधार मिळवून दिला.
अजित डोवाल यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करत मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांनी शंभर वर्षांपर्यंत देशसेवा करण्याची शक्ती ईश्वराने त्यांना द्यावी, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.


