पुणे : महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला गतिमान करण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने आज पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होत्या.दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना उधाण आले असतानाच अजित पवार गटाने प्रत्यक्ष निवडणूक तयारीला सुरुवात केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षाची रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.येत्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचा फॉर्म्युला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून वापरण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
भाजपप्रमाणेच तरुण आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देत पक्षाची मुळे अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागात युवकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.दरम्यान, पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निलेश थिगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजगुरुनगर येथील रहिवासी असलेले थिगळे गेल्या नऊ वर्षांपासून युवक संघटनेत सक्रिय असून, त्यांच्या संघटनात्मक अनुभवाची आणि युवकांमधील लोकप्रियतेची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे युवक आघाडीला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.बैठकीनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचे संकेत दिले.
काही तालुक्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवू शकतात, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे मैदानात उतरतील, असे त्यांनी सूचित केले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून, स्थानिक पातळीवर समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एकूणच, जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल, युवा नेतृत्वाला संधी आणि रणनितीतील बदल यामुळे राजकीय वातावरण तापू लागले असून, आगामी काळात ग्रामीण राजकारणात राष्ट्रवादीकडून आक्रमक पावले टाकली जाण्याची चिन्हे दिसत आहेत.


