31.4 C
New Delhi
Sunday, July 26, 2026
HomeTop Five Newsदगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य

दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; मंदिरात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

पुणे:  काळी, हिरवी आणि लाल टपोऱ्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.


 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्म चे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. आज सह्याद्री फार्म ला २२,००० शेतकरी जोडले गेले आहेत. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून म्हणून सह्याद्रीची ओळख आहे. द्राक्षाच्या नवीन पेटंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करीत आहे.  मागील पाच वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम आता श्रद्धा, कृषी आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम ठरला आहे.
 
सुनील रासने म्हणाले, द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला विघ्नहर्त्याचे आशीर्वाद मिळावेत, हंगाम सुरळीत जावा आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे, या भावनेतून हा नैवेद्य अर्पण केला जातो. या उपक्रमाची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्याचा सामाजिक पैलू. गणरायाच्या आराशीनंतर लगेचच ही ताजी द्राक्षे प्रसाद म्हणून भाविकांना वाटली जातात. तसेच परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि सेवाभावी संस्थांनाही हा प्रसाद दिला जातो. त्यामुळे हा उपक्रम केवळ धार्मिक न राहता समाजाशी जोडलेला लोकाभिमुख उपक्रम ठरतो.  

महेश सूर्यवंशी म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्या पासून आराम मिळतो.

द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
31.4 ° C
31.4 °
31.4 °
59 %
3.3kmh
100 %
Sun
36 °
Mon
39 °
Tue
37 °
Wed
33 °
Thu
32 °

Most Popular

Recent Comments