विधान परिषद निवडणुकीची चाहूल; महाराष्ट्रात २६ जागांसाठी रंगणार राजकीय लढत
Election News | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. तर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान : भारत निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
या निवडणुकीत विधानसभेच्या सदस्यांमधून निवडून द्यायच्या ९ जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तब्बल १७ रिक्त जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विधानसभेतून निवडल्या जाणाऱ्या या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. political

कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि राजेश राठोड यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांचाही कार्यकाळ समाप्त होत आहे.politics
सध्याच्या विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेतल्यास भारतीय जनता पक्षाला पाच जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेला दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला एक आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, अतिरिक्त मतांचे गणित आणि उमेदवारीतील बदल यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून चुरशीची लढत अपेक्षित आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागा गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका न झाल्यामुळे या जागांवर मतदान होऊ शकले नव्हते. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने ७५ टक्के मतदार निकष लागू करत या जागा भरण्याची तयारी सुरू केली आहे.
सोलापूर, पुणे, नाशिक, नागपूर आणि ठाणे यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या नव्या नियमांमुळे तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महायुती आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी सज्ज झाली आहे, तर महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी जोरदार रणनीती आखत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जागांवर सर्व पक्षांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
विधान परिषदेतील कार्यकाळ संपणारे आमदार :
- राजेश राठोड (काँग्रेस)
- उद्धव ठाकरे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
- नीलम गोऱ्हे (शिवसेना)
- प्रवीण दटके (भाजप)
- रमेश कराड (भाजप)
- गोपीचंद पडळकर (भाजप)
- रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
- शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)
- अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
एकूणच, विधान परिषद निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणाऱ्या ठरणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


