Pune News | पुणे: ॲल्युमिनियम सॅंड कास्टिंगमध्ये देशातील अग्रगण्य असलेल्या पुण्यातील तौरल इंडियाच्या सुपा येथील उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुपा एमआयडीसी (अहिल्यानगर) येथे येत्या रविवारी (ता. ८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ व तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी मुख्य कार्यपालन अधिकारी उमाकांत शिवणकर, कॉर्पोरट कम्युनिकेशन्सचे सहायक व्यवस्थापक निलेश जायभाये उपस्थित होते.

भरत गीते म्हणाले, “आत्मनिर्भर भारताचे ध्येय घेऊन सुरु केलेल्या तौरल इंडियाने चाकणनंतर आता दुसरा उत्पादन प्रकल्प सुपा एमआयडीसीमध्ये उभारला आहे. या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक ॲल्युमिनियम सॅंड कास्टिंग उत्पादन होणार आहे. हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा औद्योगिक टप्पा ठरणार असून, परिसरातील आर्थिक विकासाला नवे बळ देणार आहे. तसेच या उत्पादन प्रकल्पामुळे १,२०० हून अधिक रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
“सुमारे १२ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर उभारलेला हा प्रकल्प या भागातील सर्वात मोठ्या ॲल्युमिनियम कास्टिंग उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथे १,२०० हून अधिक थेट रोजगार निर्माण होणार असून, यासोबतच वाहतूक, लॉजिस्टिक्स, देखभाल, स्थानिक पुरवठादार, खानावळ सेवा आणि लघुउद्योगांमधून मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे सुपा परिसरात आधुनिक औद्योगिक संधी उपल्बध होऊन स्थानिक युवकांना आपल्या गावाजवळच स्थिर व कौशल्याधारित रोजगार मिळणार आहे. त्यामुळे महानगरांकडे स्थलांतर करण्याची गरज कमी होणार आहे. तौरल इंडिया स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, शॉप-फ्लोअर प्रशिक्षण आणि सुरक्षा-केंद्रित औद्योगिक पद्धती राबविण्यावर भर देणार आहे,” असे भरत गीते यांनी सांगितले.

“दावोस येथे २०२५ मध्ये झालेल्या ५०० कोटींच्या सामंजस्य करारातून वर्षभरातच हा प्रकल्प साकारला आहे. राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीचे प्रत्यक्ष विकासात रूपांतर केल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. हा प्रकल्प रेल्वे, ऊर्जा, मोबिलिटी, संरक्षण व औद्योगिक पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी उच्च दर्जाचे ॲल्युमिनियम घटक निर्मिती करणार असून, सुपा व अहिल्यानगरला प्रगत उत्पादनाचे नवे केंद्र म्हणून ओळख मिळवून देणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.


