रविवार २६ जुलै रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी १०.०० वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष माजी आमदार युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि सत्याग्रही मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यावर सोमवार दि. २० जुलै रोजी दुपारी पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. शनिवार दि. १८ जुलै रोजी डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव डॉ. कबीर सप्तर्षी लंडनहून परतल्यावर आज दुपारी अंत्यविधी पार पडला. याप्रसंगी असंख्य मान्यवर व कार्यकर्त्यांनी ‘डॉ. कुमार सप्तर्षी अमर है’ असा नारा दिला.पुण्याच्या कोथरूड येथील गांधी भवन येथे सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० यावेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मोठ्या काचेच्या बंदिस्त पेटीत ठेवलेल्या त्यांच्या पार्थिवावर असंख्य मान्यवर व कार्यकर्त्यांनी शोकाकुल मनस्थितीत त्यांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. कबीर सप्तर्षी, सून डॉ. दीप्ती, भाऊ डॉ. प्रवीण सप्तर्षी, बहिण लता ऋषीपाठक व बहिण श्रीमती बडवे, नंदा पाटील व अन्य नातेवाईक यांची भेट घेऊन सर्वांनी त्यांचे सांत्वन केले.यानंतर फुलांनी सजवलेल्या रथातून बंद काचेच्या पेटीतून त्यांचे पार्थिव वैकुंठ स्मशान भूमीत आण्यात आले. तेथे विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणात आले. वैकुंठ स्मशान भूमीत प्रारंभी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी संस्थेतर्फे श्रद्धांजली अर्पण केली तसेच रविवार दि. २६ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, ‘एका वादळी आणि लढाऊ नेतृत्वाला आज निरोप देण्यात येत आहे. महाराष्ट्रात १९७० पासून समाजात कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. युवक क्रांती दलाच्या माध्यमातून सामाजिक भान त्यांनी निर्माण केले. गांधी भवन माध्यमातून समाजाला दिशा देणारे अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले. त्यांनी चांगले विचार आणि संस्कार समाजात रुजविण्याचे काम केले. त्यामुळे युगपुरुष त्यांना आपण म्हणू शकतो. त्यांचे विचार पुढे नेत राहिले तरच त्यांची पोकळी आपल्याला कधी जाणवणार नाही’ असे ते म्हणाले. महात्मा गांधींचे पणतू व महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त तुषार गांधी म्हणाले, ‘डॉ.कुमार सप्तर्षी यांचे माझ्यासोबत लहानपणापासून संबंध होते. ते लोक अनेक जणांच्या आयुष्यावर परिणाम करत असतात. त्याप्रमाणे डॉ. सप्तर्षी यांनी अनेक जणांच्या आयुष्यात बदल घडवला आहे. कुटुंबाला मागे सोडून समाजासाठी काम करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. अजून पुष्कळ गोष्टी त्यांना करायच्या होत्या असे त्यांनी मृत्यूला देखील सांगितले असेल. त्यांचे अचानक निघून जाणे हे धक्कादायक असले तरी ते अखेरपर्यंत काम करत राहिले’ असे ते म्हणाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,’ जन्म झाल्यावर मृत्यू हे ईश्वराने आपल्याला दिलेले कालचक्र आहे. जिद्द, सचोटी आणि जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न युवक क्रांती दलाच्या माध्यमातून डॉ. सप्तर्षी यांनी काम केले. पुरोगामी विचार जपणे आणि गांधी विचार समाजात रुजविण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे अनेक कार्यकर्ते घडले गेले आहेत. त्यांच्या विचारांची आज देखील आवश्यकता आहे. त्यांच्यामुळे आज एक तारा निखळला आहे. जीवनाच्या वाटा योग्य बनवताना अनेकांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे असणे हे ऊर्जा देणारे होते. त्यामुळे यापुढे कोणाकडे पाहून वाटचाल करावी असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे. गांधी यांच्या विचारांचा काँग्रेसचा विचार समाजात रुजविण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले’ असे ते म्हणाले.डॉ. प्रवीण सप्तर्षी म्हणाले की, ‘माझे भाऊ सामाजिक कामात अग्रेसर होते. ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तन करण्याच्या दृष्टीने त्यांनी योगदान दिले. एक वृक्ष लावून आम्ही त्यांचे अस्थी विसर्जन करणार आहे. माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त प्रा. मच्छिंद्र गोर्डे, विश्वस्त एम. एस. जाधव, विश्वस्त रमेश आढाव, माजी आमदार विद्या चव्हाण, महाराष्ट्राचे नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, कॉंग्रेस शहराध्यक्ष (पश्चिम विभाग) दिप्ती चवधरी व पूर्व विभाग अध्यक्ष प्रशांत जगताप, मनसे नेते बाळा नांदगावकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, विठ्ठल मणियार, सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल, घटना अभ्यासक उल्हास बापट, ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, अरुण खोरे, प्रवीण.प्र. वाळिंबे, अभय कुलकर्णी, माजी आयपीएस अधिकारी अशोक धिवरे ,एस. एम. मुश्रीफ, चंद्रशेखर दैठणकर, माजी एसीपी मिलिंद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अॅड. अंकुश काकडे, विकास लवांडे, विशाल तांबे, अॅड. नीलेश निकम, शिवसेना नेते रघुनाथ कुचीक , शिवसेना नेते गजानन थरकुडे, लेखक अच्युत गोडबोले, उद्योजक राहुल म्हस्के, श्याम मानकर, काँग्रेस पक्षाचे नेते चंदुशेठ कदम, संजय बालगुडे, काका चव्हाण, धनंजय शिंदे, नवनीत गांधी, युवक काँग्रेसचे शिवराज मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदीप देशमुख, रुपाली पाटील – ठोंबरे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, रिक्षा पंचायत संघटनेचे नितीन पवार, अभिनेते रमेश परदेशी, आर जे संग्राम खोपडे, अंनिस पदाधिकारी मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, पर्यावरणवादी पोपट आबा खोसे, समाजवादी शिक्षण हक्क सभेचे शरद जावडेकर, योग तज्ञ डॉ. संप्रसाद विनोद, नगरसेवक राजाभाऊ बराटे, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, युवक क्रांती दलाचे रामराव जाधव, वनकामगार संघटनेचे नेते प्रकाश शिंदे, पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ. सतीश देसाई, प्रशांत कोठाडिया डॉ. रवी चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. किरण कदम, पी.एम.शहा फाउंडेशनचे अॅड. चेतन गांधी, एस.एम.जोशी फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे, व्यवस्थापक राहुल भोसले, सहसचिव उपेंद्र टन्नु, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे प्रमुख शमसुद्दीन तांबोळी, कलावंत कुमार आहेर तसेच गांधीभवन मधील सर्व कर्मचारी यांनी डॉ. सप्तर्षी यांना श्रद्धांजली अर्पण केली.


