पिंपरी,- : शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत योग्य काळजी घेतल्यास उष्माघातासारख्या गंभीर आजारापासून बचाव करता येऊ शकतो.
उष्माघात ही एक गंभीर आरोग्य समस्या असून शरीराचे तापमान अत्यंत वाढल्यास चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या, डोकेदुखी, गोंधळ होणे किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी विलंब न करता त्वरित सावलीत जाऊन प्राथमिक उपचार घ्यावेत व जवळच्या महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन उष्माघातापासून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे.


