पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असून, या संपूर्ण रॅकेटला राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हडपसर तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत विषारी हातभट्टी दारू सेवन केल्याने सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट निर्माण झाली असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली, तरी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

सराईत आरोपींकडून शहरातील विविध भागांत खुलेआम अवैध दारूची निर्मिती आणि विक्री सुरू होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग नेमका काय करत होता, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध दारू व्यवसाय सुरू राहू शकत नाही.
– रोहन सुरवसे-पाटील (नेते-राष्ट्रवादी काँग्रेस)


