blood camp | पुणे : करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाची भावना जेव्हा मानवी जीवनात जागृत होते, तेव्हा व्यक्ती स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे प्रभावी माध्यम बनते. निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेतून परोपकार, करुणा आणि मानवसेवेच्या उदात्त भावनेने संत निरंकारी मिशनतर्फे दि. २६ जुलै २०२६ रोजी दत्तनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात २०० युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले. निरंकारी रक्तपेढी तसेच ससून रुग्णालय रक्तपेढीच्या च्या अनुभवी डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित, शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण आयोजनामध्ये स्वच्छता, सुरक्षितता, नियोजन आणि सेवाभाव यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित न राहता मानवता, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. blood camp

शिबिराचे उद्घाटन मिशनचे पुणे क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक श्री.अवनीत तावरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी दत्तनगर परिसरातील नगरसेविका स्मिताताई कोंढरे याचबरोबर अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी शिबिरास सदिच्छा भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या समाजोपयोगी कार्याचे मनापासून कौतुक केले.

विशेष म्हणजे, संत निरंकारी मिशनची रक्तदानाची ही पवित्र सेवा-परंपरा गेल्या चार दशकांहून अधिक काळ अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत देशभरात होणाऱ्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १५,००,००० पेक्षा जास्त युनिट रक्त संकलित करण्यात आले असून, मानवसेवेसाठी मिशनची अटळ बांधिलकी यामधून अधोरेखित होते.
युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवनाचा स्वीकार करून आपली शक्ती समाजसेवेसाठी अर्पण करण्याचे आवाहन केले. त्यानंतर बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा प्रेरणादायी संदेश देत रक्तदानाला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. हाच मानवसेवेचा संदेश आजही सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, रक्तदाते, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी तसेच या उपक्रमाच्या आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे श्री.अनंत दळवी जी मुखी इंदिरानगर यांनी मनःपूर्वक आभार मानले.


