पुणे, – धर्म, अर्थ आणि नीती या तीन बाबी आधुनिक काळात स्वतंत्र मानल्या जातात, मात्र त्या परस्परपूरकच आहेत आणि प्राचीन भारतीय शिक्षणक्रमात त्यांचा समावेश तशा पद्धतीनेच केलेला होता. धर्माशिवाय अर्थ आणि धर्म तसेच अर्थ या दोघांशिवाय नीती ही कल्पना अपूर्ण राहते, याची जाणीव भारतीयांना होती असे प्रतिपादन नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सचिन चतुर्वेदी यांनी केले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे आयोजित वसंत कोठारी स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या बरोबरच विदुरनीती, शुक्रनीती, कामंदकीय नीतिसार यासारख्या ग्रंथांचाही समावेश अभ्यासक्रमात होणे आवश्यक आहे, तसेच देश, काल आणि पात्र व्यक्ती या संकल्पनांवर आधारित धोरणांची गरज आज देशाला आहे.
या प्रसंगी वसंत कोठारी स्मृती सभाकक्ष, वारसा-उद्यान तसेच संस्थेच्या ‘अर्थ अँड नीति – फॅसेट्स ऑफ धर्मशास्त्र’ या ऑनलाइन अभ्यासक्रमाचे उद्घाटन बॅ. वसंत कोठारी यांचे पुतणे राज कोठारी यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी विशेष भाषण करताना संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया म्हणाले की, शस्त्रविद्या, विद्वत्ता आणि शेती या तिन्ही बाबी प्राचीन भारतात परस्परपूरक आणि आवश्यक मानल्या जात होत्या. अहिंसेचा अतिरेक हा प्राचीन काळात समाजात प्रचलित नव्हता. त्यामुळेच अरबी आक्रमणापुढे अनेक देश एकामागून एक कोसळत असताना भारताने त्या आक्रमणाशी पाच शतके यशस्वी मुकाबला केला होता.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेच्या विद्यापरिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप आपटे यांनी सांगितले की, सर्व समस्यांना अगदी अखेरची अशी उत्तरे नसतात, तर काही वेळेला आंशिक आणि मर्यादित तोडगे हेही महत्त्वाचे ठरतात हे प्राचीन परंपरेने जाणलेले होते.
संस्थेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विविध विषयांचे एकूण तेवीस अभ्यासक्रम सध्या उपलब्ध असून आजपर्यंत सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा लाभ घेतलेला आहे, तसेच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भांडारकर संस्था अधिकाधिक लोकांपर्यंत प्राचीन भारतीय ज्ञानाचा प्रसार करीत आहे, असे प्रतिपादन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.डॉ. गौरी मोघे यांनी आभार मानले. नीहारिका देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.


