28.6 C
New Delhi
Thursday, July 9, 2026
Homeआरोग्यगरजूंसाठी 'पृथ्वी मोबाईल क्लिनिक' करतेय अवघ्या पाच रुपयात तपासणी, औषधोपचार

गरजूंसाठी ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’ करतेय अवघ्या पाच रुपयात तपासणी, औषधोपचार

उमेश चव्हाण यांच्या पुढाकाराने रुग्ण हक्क परिषदेची आरोग्य चळवळ

  • पुणे: गरीब, गरजू, मजूर, वस्ती भागांतील नागरिकांसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’चा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या पाच रुपयांत आरोग्य तपासणी, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. या उपक्रमातील १११ वे शिबीर बुधवारी झाले असून, आजअखेर १०,०७७ रुग्णांना याचा लाभ झाला आहे, अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी रुग्ण हक्क परिषदेच्या शहराध्यक्षा अपर्णा साठ्ये-मारणे, डॉ. आदिनाथ लांडे, डॉ. अनिकेत मडावी, अमित जागडे, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.

उमेश चव्हाण म्हणाले, “एकाच ठिकाणी दवाखाना निर्माण केला असता, तर सगळीकडे सेवा देता आली नसती. त्यामुळे मोबाईल क्लिनिकची संकल्पना राबविली जात आहे. सध्या पुण्यातील ६० ठिकाणी ही आरोग्यसेवा दिली जात असून, यामध्ये दोन डॉक्टर, दोन नर्स, वाहनचालक, एक समन्वयक, दोन मदतनीस कार्यरत आहेत. एमआरआय व सिटी स्कॅन यासारख्या तपासण्याची मोफत केल्या जात आहेत. तसेच गंभीर आजारांवर शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक वस्तीत महिन्यातून एकदा तपासणी व औषधोपचार केले जात आहेत.

“नियमित तपासणीच्या अभावाने मोठमोठे आजार होतात. आजार अंगावर काढणे, वेळेत उपचार झाले नाहीत, तर तो आजार बळावतो. त्यामुळे आजाराच्या प्राथमिक टप्प्यातच रक्त तपासण्या, औषधोपचार घेणे गरजेचे असते. मात्र, झोपडपट्टीतील, गरीब वस्तीमधील नागरिक, हातावर पोट असणारे मजूर आणि वृद्ध नागरिकांना हॉस्पिटल, तपासण्या आणि मेडिकलमधील औषधांचा लाखो रुपयांमध्ये येणारा खर्च परवडणारा नसतो. परिणामी, आरोग्याकडे दुर्लक्ष होते, आजार बळावतो. हे टाळण्यासाठी आणि गरजूंना दर्जेदार उपचार मिळावेत, या भावनेतून रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून २५ लाखांच्या स्वखर्चाने हा अद्ययावत ‘व्हॅनिटी’ दवाखाना निर्माण केला आहे. त्यासाठी जनता सहकारी बँकेचे कर्ज घेऊन टाटा विंगर वाहन खरेदी केले आहे,” असे अपर्णा साठ्ये-मारणे यांनी सांगितले.


बाबा आढावांकडून प्रेरणा

कष्टकऱ्यांचे नेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांनी १० रुपयात कष्टाची झुणका-भाकर केंद्र सुरु केले होते. तीच प्रेरणा घेऊन गरिबांना चांगले दर्जेदार उपचार, तपासण्या व मोफत औषधोपचार फक्त पाच रुपयात देण्याचा निर्णय रुग्ण हक्क परिषदेतर्फे घेतला. आतापर्यंत १०७ ठिकाणी या फिरता दवाखान्याने सेवा दिली आहे. रुग्ण हक्क परिषदेशी संलग्नित संस्था ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’ हा फिरता दवाखाना चालवला जात आहे. यासाठी रोजचा खर्च १२ हजार, तर महिन्याचा खर्च तीन लाख ६० हजार रुपये असून, हा खर्च स्वतः उमेश चव्हाण करीत आहेत. रुग्ण हक्क परिषद व उमेश चव्हाण यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोट
“गरिबांना वेळेत तपासणी व औषधोपचार मिळाले तर मोठमोठे आजार टाळता येतात. पैशाअभावी कोणाचंही उपचाराअभावी नुकसान होऊ नये, म्हणूनच आम्ही फक्त पाच रुपयांत दर्जेदार सेवा देण्याचा निर्णय घेतला. ही केवळ सेवा नाही, तर आरोग्याबाबत जनजागृतीची चळवळ आहे.”

  • उमेश चव्हाण, संस्थापक, रुग्ण हक्क परिषद

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.6 ° C
28.6 °
28.6 °
70 %
4.1kmh
100 %
Thu
28 °
Fri
38 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
42 °

Most Popular

Recent Comments