पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या काळात समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी अधिकृत पत्र पाठवून प्रशासनाला योग्य निर्देश देण्याची विनंती केली आहे.
वाडेकर यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, पुणे शहरात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र काही वेळा उत्सवाच्या गर्दीमुळे किंवा परिस्थितीमुळे किरकोळ नियमभंग होतो आणि त्यावरून काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात.
मागील काही वर्षांत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. समाजाच्या वतीने हे गुन्हे मागे घेण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे २०१६ ते २०२४ या कालावधीत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये — जसे की गणेशोत्सव किंवा इतर सार्वजनिक उत्सवांमध्ये दाखल झालेले गुन्हे शासनाकडून मागे घेण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर आंबेडकर जयंतीदरम्यान दाखल झालेले गुन्हेही तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी उपमहापौरांनी पत्राद्वारे केली आहे. याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.


