पुणे,- : बहुआयामी व अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम ग्लोबल साउथ ही संकल्पना मांडली होती. जगा आणि जगू दया व विश्व शांतीचे ते पुरस्कर्ते होते. मूल्याधिष्ठित, मूल्यवर्धित आणि युनिव्हर्सल व्हॅल्यू असलेल्या शिक्षणाची संकल्पना ही मांडणारे तेच होते. असे मत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी व्यक्त केले.
प्रबुद्ध नायक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने साजरी केली. या प्रसंगी त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
या प्रसंगी प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रा.डॉ. दत्ता दंडगे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विनोद जाधव व डॉ. विक्रम गायकवाड उपस्थित होते
लेखक डॉ. विनोद जाधव लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आर्शिर्वादाने व एमआयटी डब्लयूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. आर एम चिटणीस म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचा एक विचार प्रेरणा म्हणून यावर्षी सर्वांनी अमलात आणावा. आपल्याकडे दोन रुपये असल्यास एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक प्रत्येकाने घ्यावे. हे बाबासाहेबांचे विचार अमलात आणावे. वर्तमान काळात युद्धामुळे सर्वांचे नुकसान झाले आहे परंतु गरीब देशांचं सर्वाधिक नुकसान होताना दिसत आहे. त्यासाठी युद्ध नको बुद्ध हवा ही भूमिका महत्त्वाची आहे.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, डॉक्टर आंबेडकर यांनी हक्कांची जाणीव निर्माण करण्यासाठी अज्ञानाचा अंधकार मिटवावा लागेल, याचे बीज प्रत्येकाच्या मनात पेरले. प्रगतीचे दरवाजे उघडण्यासाठी सतत ज्ञानाची भूक हवी हे त्यांनी सांगितले.
प्रा.डॉ. दत्ता दांडगे म्हणाले, विचारांना विरोध कसा करावा हे शिकायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे पाहावे लागेल. महात्मा फुले यांच्याकडून भावनात्मक विचार घेता येतात. त्यांनी सर्वप्रथम सत्याच्या प्रयोगाच्या अनुकरण केले.
याप्रसंगी विद्यार्थिनी आदिती, डॉ.विक्रम गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश मानवजातीला दिला. तसेच, त्यांनी आयुष्य भर जनतेसाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला


