29.7 C
New Delhi
Wednesday, July 29, 2026

भारताची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत – सतीश मराठे

पुणे, – सध्याच्या युध्दाच्या अस्थिरतेतदेखील भारताची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असून दरडोई उत्पन्नात देखील चांगली वाढ झाली आहे तर सुमारे २५ कोटींहून अधिक नागरिक हे दारिद्र्यरेषेच्यावर आले आहेत. दुसरीकडे १५ कोटींहून अधिक स्वयंरोजगार करणारे वाढले आहेत, ही प्रगतीच्या दिशेने जाणारी आशादायी वाटचाल आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे संचालक सतीश मराठे यांनी आज येथे केले.

सहकार सुगंध प्रकाशित आणि जयंत काकतकर लिखित “सरकारी कर्जरोखे – गुंतवणुकीचा एक उकृष्ट पर्याय” या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. सहकार सप्ताहाच्या निमित्ताने कॉसमॉस बँकेच्या सहकार सभागृहात संपन्न झालेल्या या प्रकाशन समारंभात राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सीए भरत फाटक, सकाळ मनीचे संपादक मुकुंद लेले, लेखक जयंत काकतकर, सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मराठे पुढे म्हणाले की, सध्याची अर्थव्यवस्था सक्षमतेकडे जात असतांना नजीकच्या काळात विविध स्तरांवर सुधारणा देखील होणार आहेत. निर्यातीला चालना मिळेल आणि उत्पादन क्षमता वाढणार आहे, परिणामी देशाची प्रतिमा उंचावणार आहे. नव्याने स्टार्ट अप वाढत असल्याने रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात व्यापक होणार आहेत असेही ते म्हणाले. सर्वसामान्य जनतेने गुंतवणुकीला प्राधान्य देण्याची गरज असून त्यामध्ये सरकारी कर्ज रोख्याला प्राधान्य द्यावे. यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

यावेळी अनास्कर म्हणाले की, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा कल हा कर्जरोख्याकडे वाढत आहे आणि लेखकाच्या समोर सर्वसामान्य गुतवणूकदार आहे. एका अर्थाने गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या पुस्तकामुळे आर्थिक साक्षरता होण्यास हातभार लागणार आहे. महागाईचा वाढता दबाव आणि तुटीची स्थिती लक्षात घेता हे पुस्तक गुंतवणूकीसाठीचा चांगला पर्याय देणारे आहे.

यावेळी पटवर्धन म्हणाले की, राज्यात पतसंस्था चळवळीची व्याप्ती मोठी आहे. त्यातील काहींनी केवळ ५ टक्के गुंतवणूक कर्जरोख्यात केलेली आहे. या पुस्तकामुळे पतसंस्थांना गुंतवणूकीसाठी नवा दृष्टीकोन मिळणार आहे. संपादक लेले यांनी पुस्तकाची आवश्यकता प्रतिपादित केली ते म्हणाले, कर्जरोखे हा लोकप्रिय असा विषय नाही त्यापेक्षा आज शेअर्सची चर्चा अधिक होते. या पुस्तकाच्या निमित्ताने कर्जरोख्यांची चर्चा व्यापक होण्यास हातभार लागणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून या विषयाबाबत जागरूकता निश्चितच वाढेल. यावेळी फाटक म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे सगळ्या गुंतवणुकीचा पाया आहे. कोणतीही जोखीम नसणारा सरकारी कर्जरोखा आहे, तो सुरक्षिततेचा मानदंड आहे.

नागरी सहकारी बँक आदर्श उपविधी समिति अध्यक्षपदी नियुक्त झालेले सहकार विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त दिनेश ओऊळकर, कॉसमॉस सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले सचिन आपटे, उपाध्यक्ष सीए यशवंत कासार आणि व्यवस्थापन मंडळ अध्यक्षपदी निवड झालेले संजीव खडके तसेच पुस्तकाचे सहयोगी लेखक आशिष कुवळेकर आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेले दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार किशोर बरकाले यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. लेखक काकतकर यांनी प्रास्ताविक केले तर सर्वांचे स्वागत प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी यांनी केले व आभार मानले. वर्षा कुलकर्णी-दाणी यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
light rain
29.7 ° C
29.7 °
29.7 °
68 %
2.5kmh
100 %
Tue
29 °
Wed
36 °
Thu
36 °
Fri
35 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments