पुणे-
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाला स्थैर्य, पारदर्शकता आणि विकासाभिमुख दिशा देण्यासाठी सक्षम व कृतिशील कार्यकारिणी देण्याची ग्वाही समर्थ पॅनलचे प्रमुख तथा चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले यांनी दिली. आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक दीपक कदम, लेखक राज काझी, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निर्माते सुनील महाजन, दिग्दर्शक अजित शिरोळे, कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप यांच्यासह महामंडळाचे माजी खजिनदार संजय ठुबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मेघराज राजेभोसले यांनी सांगितले की, समर्थ पॅनलचे ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि संकलक विजय खोचीकर हे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १४ उमेदवारांनाही सभासदांचा मोठा पाठिंबा लाभत असून तेही मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, संगीतकार, तंत्रज्ञ, कामगार आणि इतर सर्व घटकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करणे तसेच संपूर्ण मराठी चित्रपट उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हा समर्थ पॅनलचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण सकारात्मक प्रयत्न केले होते; मात्र त्यास प्रतिस्पर्धी गटाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी महामंडळाचे माजी खजिनदार संजय ठुबे यांनी प्रतिस्पर्धी पॅनलकडून करण्यात येणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांचे खंडन केले. आपल्या कार्यकाळात मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या आर्थिक कारभारात शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यात आले. आर्थिक व्यवहारांचे काटेकोर नियोजन करून संस्थेची विश्वासार्हता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला. मागील ५५ वर्षांच्या इतिहासात न झालेली अनेक विकासकामे आपल्या कार्यकारिणीच्या काळात पूर्ण झाली, असेही त्यांनी नमूद केले.
लेखक राज काझी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समर्थ पॅनलच्या विजयानंतर मराठी चित्रपट उद्योग अधिक किफायतशीर, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना नव्या बाजारपेठा उपलब्ध होत असून त्या संधींचा प्रभावी लाभ मराठी चित्रपटसृष्टीला मिळवून देण्यासाठी महामंडळ पुढाकार घेईल.
यावेळी वक्त्यांनी महामंडळाचे माजी अध्यक्ष अजय सरपोतदार यांच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाला एक प्रतिष्ठित स्थान प्राप्त झाले होते. त्यानंतर काही काळ महामंडळाच्या कामकाजात अडथळे निर्माण झाले. मात्र मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचा कारभार पुन्हा मार्गी लावण्याचे प्रयत्न झाले. कार्यकाळाच्या अखेरीस अंतर्गत वाद, आरोप-प्रत्यारोप आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे काही प्रमाणात कामकाज प्रभावित झाले असले तरी भविष्यात हे सर्व प्रश्न सोडवून महामंडळ अधिक गतिमान, सक्षम आणि सभासदाभिमुख करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक अजित शिरोळे,दिग्दर्शक दीपक कदम आणि कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. समर्थ पॅनलने केलेल्या कामांवर सभासदांचा विश्वास असून पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


